कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. जिल्ह्यात ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा वारसा राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. महापूर, कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले. जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत आहेत. सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात. भारती विद्यापीठाचे कार्यवाह ते राज्याचे कृषी, सहकार राज्यमंत्री अशी गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस...
केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या उक्ती आणि कृतीचा वारसा विश्वजित कदम यांनी जपला आहे. तसे वयाच्या १८व्या वर्षांपासून ते राजकारण, समाजकारण आहेत. भारती विद्यापीठसारख्या जागतिक शैक्षणिक संस्थेचा कार्यभार पाहताना त्यांनी या विद्यापीठाला जगाच्या नकाशावर नेले. गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन हे ब्रीद घेऊन ते काम करीत आहेत. शैक्षणिक संस्थेचा डोलारा सांभाळतानाच त्यांनी स्रीभ्रूणहत्येसारख्या सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. मुलगी हवी हो हे अभियान त्यांनी राज्यभर राबत जनजागृती केली. २००७ साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पक्षबांधणीसाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. २००८ साली युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध उपक्रमातून युवक कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले. राज्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना शासनस्तरावरून मदत व्हावी, यासाठी ५३२ किलोमीटरचा पायी बुलढाणा ते सांगली अशी संवाद यात्रा काढली. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर दोनदा प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यातील युवकांना पक्षासोबत जोडण्याचे काम केले.
पतंगराव कदम यांच्या अचानक निधनानंतर विश्वजित कदम यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी खांद्यावर घेतली. राज्याच्या इतिहासातील पहिला बिनविरोध आमदार म्हणून विश्वजित कदम यांच्या नावावर नवा विक्रम नोंदविला गेला. २०१९मध्ये कृष्णा नदीला आलेल्या प्रलयंकारी महापुराचा फटका पलूस तालुक्यासह नदीकाठच्या भागाला बसला. या पुराच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता एक महिनाभर ते दिवसरात्र राबत होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून पुरातून अनेक लोकांना वाचविले. पूरग्रस्त कुटुंबाला राहण्याची, भोजनाची सोय, औषधोपचाराच्या सुविधा, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता करून दिली. सूर्योदयापासून रात्रीपर्यंत ते पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी धावत होते. पूर ओसरल्यानंतर स्वच्छता, रोगराई पसरू नये याची खबरदारी घेत पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. संवेदनशील नेता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ महाराष्ट्राला घालून दिला.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. विश्वजित हे सव्वा लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. राज्य मंत्रिमंडळात कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास, मराठी भाषा अशा विविध खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. त्यानंतर राज्यासह जिल्ह्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटातही ते लोकांच्या मदतीला धावले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्याला बऱ्याचअंशी यशही आले. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नांवर त्यांचे बारीक लक्ष असते. शहरातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना बळ देण्याचेही ते काम करतात. पाणी, दुष्काळ, आरोग्याच्या प्रश्नासोबतच जिल्ह्याच्या विकासावर त्यांनी भर दिला आहे.
कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे. विश्वजित कदम यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरो आणि राज्याचे नेतृत्व करो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा...
- अभिजित भोसले
नगरसेवक, सांगली