उमदी : उमदी (ता. जत) परिसराला शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये द्राक्ष बागा तसेच शेडवरील वाळत घातलेल्या बेदाण्याचे माेठे नुकसान झाले.
शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जाेरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश शेतकऱ्यांची द्राक्षे अजूनही शेतात आहेत. काही शेतकऱ्यांची द्राक्षे बेदाणा शेडवर वाळत आहेत. सध्या बेदाणा निर्मितीची प्रक्रिया गतीने सुरू आहे. मात्र, एकाचवेळी सर्वच द्राक्षे काढणीला आल्यामुळे बागायतदारांना बेदाण्यासाठी शेड उपलब्ध होत नाही. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची द्राक्ष अजूनही शेतातच आहेत. शुक्रवारी दिवसभर हवेत आर्द्रता होती. सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वारे व पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मात्र पिके वाचविण्यासाठी चांगलीच कसरत झाली. यामुळे तयार होत असलेल्या बेदाणा काळा पडून नुकसान होणार आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने शेतीपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी उमदी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. चन्नाप्पा होर्तिकर यांनी केली आहे.