इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे सांडपाण्याच्या पाइपमधील पाणीगळतीच्या कारणातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये दोन्हीकडील चौघे जखमी झाले. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत दोन्ही कुटुंबांनी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
विकास साताप्पा कांबळे याने दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या घराशेजारी सुभाष सुरुपा कांबळे हा त्याच्या कुटुंबासह राहण्यास आहे. सांडपाण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांत वारंवार तक्रारी झाल्या आहेत. मंगळवारी दुपारी सुभाष कांबळे याने विकास कांबळे याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. सांडपाण्याच्या पाइपची गळती काढली आहे, त्यामुळे विनाकारण शिवीगाळ करू नका, असे सांगत असताना, सुभाष कांबळे याने त्याच्या हातील खुरपे विकास कांबळे याच्या डाव्या कानाच्या पाठीमागे मारून त्याला मारून गंभीर जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या विकास यांची पत्नी नंदा कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सीमा सुभाष कांबळे, लक्ष्मी जयकर कांबळे, सोनाली सुभाष कांबळे, पौर्णिमा शरद रणभिसे, साक्षी शरद रणभिसे, स्नेहल शरद रणभिसे, जयकर सुभाष कांबळे आणि सुभाष सुरुपा कांबळे अशा सर्वांविरुद्ध गंभीर दुखापतीसह गर्दी मारामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पौर्णिमा रणभिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत सांडपाण्याच्या गळतीच्या कारणावरूनच विकास कांबळे याने त्याच्या हातीतील खुरप्याने वडील सुभाष कांबळे यांच्या डाव्या कानाजवळ मारून जखमी केले. पौर्णिमा रणभिसे या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, सुुनील विकास कांबळे याने शिवीगाळ केली, तर विकास कांबळे याने खुरप्याने उजव्या हाताच्या पंज्यावर वार केला. नातेवाइकांनी हे भांडण सोडविल्यावर दोघांनी पलायन केले. विकास कांबळे आणि सुनील कांबळे यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.