फोटो-३००४२०२१-आयएसएलएम- पाडळी न्यूज
शिराळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर पाडळीच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पाडळी (ता. शिराळा ) येथील दोन सख्ख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरणालगत पाडळी हद्दीत घडली. विक्रम ऊर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे मृत युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा काढला. दोन युवा शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली होती.
विक्रम पाटील व मानसिंग पाटील हे दोघे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाडळीच्या लातोंडी नामक परिसरातील शेतात पाण्याच्या मोटरीकडे गेले होते. यावेळी त्यांना विद्युत धक्का लागला. तेथे असणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून तातडीने दुचाकीवरून शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर नागरिक वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयाबाहेर जमले. आम्ही तक्रार करूनही वेळेत वीज मोटार कनेक्शनची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे आज दोघांना प्राण गमवावे लागले. जोपर्यंत याबाबत ठोस कारवाई केली जात नाही. तोपर्यंत शवविच्छेदन करून देणार नाही असा पवित्रा घेतला होता. याची दखल घेत उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यानंतर वरिष्ठ कार्यालयातील तज्ज्ञ, तसेच अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे पोलीस पाठविले.
मानसिंग हे शिराळा येथील खासगी कारखान्यात नोकरीस होते. ते अविवाहित असून, त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. विक्रम हे मुंबई येथे खासगी नोकरीत होते. याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सुनील बबन पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत. विक्रम हे मुंबईत खासगी नोकरी करीत होते. लॉकडाऊनमुळे चार-पाच दिवसांपूर्वीच ते पाडळी येथे सहकुटुंब गावाकडे आले होते.