मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी दुपारी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या नादुरुस्त ट्रकला टँकर व त्यापाठोपाठ कारने धडक दिली. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धैर्यशील बजरंग पाटील (वय ३५, रा. कामेरी, ता. वाळवा), श्वेता मोहन सुतार (१६), ओमकार मोहन सुतार, शुभम मोहन सुतार (तिघेही, रा. पणुंब्रे, ता. शिराळा), मारुती अप्पा लोखंडे, राधिका उत्तम मोरे (दोघेही, रा. जयसिंगपूर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेशनिंगचे धान्य घेऊन कोल्हापूरला निघालेला ट्रक नादुरुस्त झाल्याने रविवारी दुपारी चालकाने वाठार गावच्या हद्दीत महामार्गावरच थांबविला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या दूध टँकर (एमएच १० एडब्ल्यू ७४७४)वरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची महामार्गावर थांबलेल्या ट्रकला जोराची धडक बसली. दरम्यान, टँकरच्या पाठोपाठ चंदूर (ता. हातकणंगले) गावाला निघालेल्या कारची अपघातग्रस्त टँकरला धडक बसली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह महामार्ग देखभाल विभागाचे गजानन सकट, अमोल भिसे, अर्जुन सूर्यवंशी, राजू खैरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी टँकरसह कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी टँकरचालकासह सोळा वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)
वाठारजवळ तिहेरी अपघात; सहा जखमी
By admin | Updated: June 15, 2015 00:18 IST