सांगली : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शहरात पुन्हा एकदा धुळीचे साम्राज्य दिसून येत आहे. अशातच उघड्या टपाच्या वाहनातून खडी, क्रश वाळू, कचरा आणि इतर साहित्याची वाहतूक करत धूळ उडविणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. पोलिसांनी अशी मालवाहतूक वाहने ताब्यात घेताच, वाहनधारकांनी लगेचच टप झाकून साहित्याची वाहतूक सुरू केली आहे.
उघड्या टपाच्या मालवाहतूक वाहनांमुळे इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय त्यातील माल रस्त्यावर पडून त्यावरून वाहने घसरण्याचे प्रकार घडले आहेत. सध्या पाऊस थांबल्याने वारे वाढले आहे. त्यामुळे मालवाहतूक वाहनाच्या मागे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. नेमकी हीच अडचण लक्षात आल्यानंतर वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी शहरातील प्रमुख मार्गावर धोकादायकरीत्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळीही मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.