लोकमत न्यूज नेटवर्क :
विटा : कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असतानाच विटा शहरात आज शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे शुक्रवारी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी विट्याच्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. परंतु, शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ जैसे थे होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट तर रस्त्यावर वर्दळ असल्याचे जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी पहावयास मिळाले.
विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शासनाने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याने विटा शहरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभा राहिले होते. खानापूर तालुक्यात दररोज दोनशे ते अडीचशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत होती.
त्यामुळे गुरुवारी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी ३०एप्रिलपासून विटा शहरात ७ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय जाहीर केला होता. शुक्रवारी या निर्णयाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला. परंतु, शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची ये-जा दिसत होती. त्यामुळे शुक्रवारी पहिल्या दिवशी केवळ व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत होते.
दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विटा शहरात जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्यथा विटा शहरात ७ दिवस जनता कर्फ्यू पुकारूनही कोरोना संसर्ग टाळता येणार नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
फोटो : ३००४२०२१-विटा-जनता कर्फ्यू :
ओळ : विटा येथे शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशीच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.