सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील चढ-उतार सुरूच असला तरी गेल्या दोन महिन्यांत प्रथमच रविवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० नवे रुग्ण आढळले, तर ३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, मृत्यूची संख्या वाढल्याने खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या सहा दिवसांत प्रथमच बाधितांची संख्या कमी होत २० रुग्ण आढळले आहेत. मात्र, दोन महिन्यांत प्रथमच तीन बळींची नोंदही झाली आहे. मिरज शहरासह कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ११ रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत ४२९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ६ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २७६ जणांच्या तपासणीतून १५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढच होत असून, सध्या ३२१ जण उपचार घेत आहेत. त्यातील ५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४५ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.