दोन दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाबाबत वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, तत्त्वहीन राजकारण आणि उद्योग चालवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यांची विश्वासार्हता नागरिकांबरोबरच पक्षश्रेष्ठींकडेही ढासळलेली आहे. त्याच वैफल्यातून ते अशी वक्तव्य करत आहेत.
नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांनी ताकद लावून यश मिळवले. यातून अरुण लाड यांच्यासारखा निष्कलंक चेहरा या मतदारसंघात आणला. आजवर त्यांनी केलेल्या कामामुळे या मतदार संघातील अडचणी बहुतांशी कमी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी पक्ष हा विधायक, सामाजिक भान, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्यायाची भूमिका मांडत महाराष्ट्रभर काम करत आहे. या वैचारिक पक्षाला आज चांगले जनमतही लाभले आहे. असा हा राष्ट्रवादी पक्ष कुंडलसह पलूस, कडेगाव तालुक्यात आपली पाळेमुळे आमदार अरुण लाड त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीद्वारे पसरवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांच्या मावळ्यांवर टीका करणाऱ्यांनी आपली उंची तपासावी.