सांगली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल. यामुळे जिल्ह्यातील ४० हजार ८४४ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, परीक्षा रद्दच्या निर्णयावर काही पालक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून मुलांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नववी आणि अकरावीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ऑनलाइन वर्गात ५० ते ६० टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. तेवढ्यात नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट वरच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे दरम्यान होणार होती. विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होता. तोपर्यंत ती परीक्षाही रद्दचा निर्णय झाला. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. सर्व बोर्डांच्या निर्णयामध्ये समानता राहावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल.
काही पालक आणि शिक्षकांना हा निर्णय रुचलेला नाही. इतर वर्गाचे ठीक आहे; पण दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय चुकीचा आहे. या विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष असते, त्यांचे योग्य मूल्यमापन होणार नाही, अशी भीती ते व्यक्त करतात.
चौकट
बारावीची परीक्षा मे महिन्यात
बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिलपासून सुरू होणार होती. जिल्ह्यात ३३ हजार ९० विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. परीक्षा दोन दिवसांवर आली असताना पुढे ढकलण्यात आली आहे. ती मेच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.