अविनाश बाड
आटपाडी : नैसर्गिक उताराने कृष्णा नदीचे पाणी माणगंगा नदीत आल्याने एकदा योजना पूर्णत्वास आला की पुन्हा वीजबिल किंवा कोणताही खर्च नाही. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा उपसा सिंचन योजनांच्या मोटारी बुडतात; पण या योजनेत बोगद्याने मोठ्या प्रमाणात, शून्य खर्चात दरवर्षी कृष्णा नदीचे पाणी उताराने माणगंगा नदीत सोडता येणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात दुष्काळी भागात पाणी आले, तर माणगंगा नदीकाठावरील सात लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. याशिवाय माणगंगा नदीबरोबर पिंगळी, येरळा, अग्रणी या नद्या ही प्रवाहीत होतील.
या प्रकल्पाच्या बोगद्याचा व्यास जितका मोठा, तितके पुराचे पाणी दुष्काळी भागात अधिक मोठ्या प्रमाणात येईल आणि कृष्णा काठावरील हानी टळणार आहे. धोम धरणावरून काढलेल्या बोगद्याला वडूज (जि. सातारा) जवळच्या लेंढूर ओढ्याजवळ येरळवाडी तलावात पाणी सोडल्यास ते पुढे येरळा नदीला मिळते. याशिवाय अग्रणी नदीही या प्रकल्पात प्रवाही करता येईल.
या प्रकल्पासाठी धोम धरण ते पिंगळी या बोगद्याची जागा वगळता कुठे जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार नाही. कुठेही पंपाने पाणी उचलावे लागत नसल्याने विजेचा प्रश्न नाही. गोंदवले बुद्रुकपासून ते माणगंगा नदीचा भीमा नदीच्या संगमापर्यंत सुमारे १६५ कि. मी. अंतरावरील नदीवर असणारे सर्व बंधारे, तलावांना पाणी मिळेल.
चौकट
इंग्रजांची चूक आपण दुरुस्त करू!
इंग्रजांनी १८८२ मध्ये बांधलेल्या राजेवाडी तलावाचे पाणी थेट सोलापूर जिल्ह्यातील शेतीला बोगदे आणि कालव्याने नेले. ते बोगदे आणि कालवे अद्याप सुस्थितीत आहेत. मात्र राजेवाडी तलावात पाणी नसते. या योजनेद्वारे या तलावात पाणी सोडल्यास सोलापूर जिल्ह्यात कालव्याद्वारे आणि तलावातून माणगंगा नदीत पाणी सोडून इंग्रजांनी केलेला अन्याय आपण दूर करू शकतो.
कोट
कृष्णा नदीवर नैसर्गिक उताराने पाणी नेणारी अशी दुसरी योजना नाही. कोयनेवर लेकटॅपिंग करून वीजनिर्मिती केल्यानंतर जे पाणी उताराने समुद्राकडे जाते, तशी ही योजना दुष्काळी भागाकडे त्या भागातील कोरड्या नदीने जाते. केंद्रीय जल आयोगाने या योजनेला मान्यता दिली आहे.
- दिनकर पवार, निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग.