दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे अशा दुहेरी पटावरच राजकीय समीकरणांचा डाव रंगत होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संजयकाका आणि घोरपडे यांच्यातील दरी वाढत गेली. सांगली बाजार समितीच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे या मतदारसंघाच्या राजकारणाचा त्रिकोणी पट तयार झाला आहे. या पटावर सत्ता गाजवण्यासाठी राष्ट्रवादीच्या गटाबरोबरच आता खासदार आणि सरकार गटातही शह-काटशहचे राजकारण रंगले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपल्याचे चित्र आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल वगळून तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याचा एक मतदारसंघ झाला. तासगाव तालुक्यात आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील असे दोन तुल्यबळ गट होते, तर कवठेमहांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे यांचा मोठा गट होता. तसेच सगरे आणि शेंडगे घराण्याचेही बालेकिल्ले मजबूत होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आर. आर. पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडे विरोधकांशी जुळवून घेत कवठेमहांकाळ तालुक्यात स्वत:चा गट तयार केला. मात्र संजयकाकांना कवठेमहांकाळमध्ये, तर घोरपडेंना तासगावमध्ये स्वत:चा गट तयार करण्यात अपयश आले. त्यामुळे या दोन नेत्यांनी जवळीक साधत आर. आर. पाटील यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. संजयकाकांपाठोपाठ अजितराव घोरपडेंनी भाजपमध्ये प्रवेश केला व तालुक्यातील राजकीय समीकरणात बदल झाला. आर. आर. यांच्याविरोधात या नेत्यांनी एकत्रित येऊन विधानसभेच्या पटावर आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये अपयश आले. या अपयशानंतर खासदार आणि सरकार यांच्यात एक अस्पष्ट दरी निर्माण झाली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही त्यांच्यातील मतभेद उघड झाले. सांगली बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने घोरपडे यांनी संजयकाकांशी फारकत घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकीय पटलावर आमदार सुमनताई पाटील, खासदार पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्या राजकारणाचा त्रिकोण पाहायला मिळणार, हे स्पष्ट झाले आहे.
तासगावच्या पटावर रंगला तिरंगी सामना
By admin | Updated: August 23, 2015 23:38 IST