लाेकमत न्युज नेटवर्क
तासगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तासगवाच्या गणपती पंचायतनचा ऐतिहासिक रथोत्सव यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे शनिवारी गणपतीची पारंपरिक यात्रा खुल्या जीपमधून काढण्यात आली. या वेळी संस्थानचे श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, आदिती पटवर्धन यांच्यासह सर्व मानकरी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तमुळे भाविकांची गर्दी झाली नाही.
तासगावचा रथोत्सव म्हणजे मोरयाऽऽचा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण आणि जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या भक्तिरसातून उत्साहाला आलेले उधाण असे वातावरण असते. मात्र शनिवारी या सगळ्या उत्सवाला फाटा देत, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि मानकरी यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक २४२ वा गणेशोत्सव पार पडला.
श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन रथोत्सव सुरु केला. रविवारी २४२ वर्षे पूर्ण झाली.
श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत साधेपणाने उत्स भक्तिमय वातावरणात पार पडला. दुपारी पटवर्धन राजवाड्यातून छबिना बाहेर पडला. त्यात पटवर्धन यांच्यासह मानकरी सहभागी झाले होते. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर जीपपर्यंत आणण्यात आली. जीपमध्ये उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. यावेळी मोजक्या मानकऱ्या समवेत सोशल डिस्टन्सचे पालन करत श्री काशीविश्वश्वेर मंदिरापर्यंत जीप नेण्यात आली. याठिकानी पूजा करून पारंपरिक पद्धतीने, अत्यंत साधेपणाने यंदाचा गणेशोत्सव पार पडला. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार सुमनताई पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.