लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने रस्त्यावरील वर्दळ वाढत चालली आहे. अनेकांनी दुकानाची शटर अर्धी उघडून व्यापार सुरू केला आहे.
वाळवा तालुक्यात सुमारे २५० वर कोरोनारुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे लसीचा दुसरा डोस मिळविण्यासाठी गर्दी होत आहे, तर दुसरीकडे खरेदीसाठी नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत आहेत. यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. चौकाचौकात पोलीस असूनही त्यांच्याकडून कारवाईत ढिलाई होत असल्याने, ग्रामीण भागातून दुचाकीस्वारांचा लोंढा वाढत आहे.
सध्या लग्नाचे मुहूर्त आहेत. त्याच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. बसस्थानक ते आझाद चौक या दरम्यानची सर्वच दुकाने अर्ध्या शटरने खुली आहेत. गांधी चौक शहरातील मुख्य चौक आहे. ते खरेदीचे केंद्र बनल्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बंदोबस्तासाठी दोन पोलीस असतात, परंतु या गर्दीकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील गर्दी कमी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनही कमी पडले आहे. पालिकेचे कर्मचारीही डोळेझाक करीत आहेत. शहरातील गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कोरोनाचा कहर झाला आहे.
चौकट
कडक कारवाईची मागणी
इस्लामपूर पालिकेत मुख्याधिकारीपद रिक्त आहे. नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी आता शहरातील गर्दी नियंत्रणासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.