शिराळा : शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्यासाठी झालेला एकमेव प्रयत्न हा सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा इतिहास आहे. तो भावी पिढीला समजावा व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्ररूपी भिंती शिल्प, अश्वारूढ पुतळा अशी ऐतिहासिक नगरी उभारणार आहे. यासाठी तातडीने आराखडा पंधरा दिवसात तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. शुक्रवार, दि. १९ रोजी या किल्ल्या परिसराची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात मुंबई येथे बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष सुनीता निकम आदी उपस्थित होते.
आमदार नाईक यांनी म्हणाले की, मुंबई येथे ही बैठक झाली. यावेळी या इतिहास नागरी उभारणीसाठी सर्व तो निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच तातडीने आराखडा तयार करण्यासाठी आदेश दिला आहे. येथील भुईकोट किल्ला परिसर तीर्थस्थळ म्हणून विकसित करणार आहे. यामध्ये चित्ररूपी घटना दर्शवणारी भिंती शिल्प, छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, किल्ल्याची तटबंदी, कोटेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर यांची दुरुस्ती व जीर्णोद्धार करणे व धारातीर्थी पडलेल्यांची मावळ्यांची समाधी बांधणार आहे. सर्व बांधकामास आधुनिक पद्धतीने न करता ऐतिहासिक पद्धतीने करण्यात येणार आहे.