दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याची माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली. दिघंचीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तहसीलदार सचिन मुळीक यांच्या आवाहनानुसार ग्राम व्यवस्थापन समिती व व्यापारी संघटना यांची बैठक घेण्यात आली. यानुसार १ ते ७ मे असे सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यासंदर्भात निर्णय झाला.
दिघंचीत सातारा सोलापूर जिल्ह्यातील नागरिक येत असतात. त्यामुळे दिघंचीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. दिघंचीत प्रतिदिवस २० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण व विनामास्क फिरू नये. घराबाहेर कोणीही पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी केले.