आटपाडी : आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी औषधांची दुकाने आणि दवाखाने वगळता बाकी सर्व दुकाने बंद ठेवून सात दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. आमदार अनिल बाबर यांनी उद्या शुक्रवारपासून दिनांक ७ मेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात यावा, असे आवाहन केले आहे.
आमदार बाबर यांच्यासह पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, प्रांताधिकारी संतोष भोर आणि तहसीलदार सचिन मुळीक यांनी तालुक्यातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. तालुक्यातील अनेक गावच्या सरपंचांनी यावेळी कोरोनाची साखळी तुटण्यासाठी कडकडीत बंद पाळावा, अशी सूचना केली. त्यानंतर फक्त सकाळी ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत दूध संकलनासाठी सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तहसीलदार सचिन मुळीक म्हणाले की, औषधांची दुकाने आणि दवाखाने वगळता किराणा मालाची दुकाने, कृषी सेवा केंद्र पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दुकानांमध्ये कायम लोकांची गर्दी होत होती. ही दुकाने आता बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.