शिराळा येथे मणदूर धनगरवाडा, विनोबाग्राम, खुदलापूर येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन विभक्त सात-बारा करणे व पुनर्वसनाबाबत असणाऱ्या अडचणींसंदर्भात चर्चा केली, तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले.
शिवाजीराव नाईक म्हणाले, १९६५ साली सातारा जिल्हा अस्तित्वात असताना सातारा जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सात-बारावर येथील संबंधित खातेदारांचे नाव नोंद केले; परंतु त्यामध्ये पूर्वीचे असणारे वन विभागाचे नाव त्यातून कमी झाले नाही. त्यामुळे या उताऱ्यांवर खातेदारांबरोबर वन विभागाचेदेखील नाव लागले आहे. त्यामुळे या गावांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा अगर सार्वजनिक विकासकामांचा लाभ मिळत नाही. जर शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, तर ग्रामस्थांना संघटित करून व्यापक आंदोलन उभे करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
यावेळी सरपंच वसंत पाटील, भागोजी डोईफोडे, बाबूराव डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, धोंडिबा डोईफोडे, टकू डोईफोडे, मारुती गिरीवाले, रामचंद्र जाधव, मोहन पाटील आदी उपस्थित होते.
फोटो-१०कोकरुड१
फोटो ओळ : मणदूर धनगरवाडा, विनोबाग्राम, खुदलापूर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन शिवाजीराव नाईक यांना दिले. यावेळी मणदूर सरपंच वसंत पाटील उपस्थित होते.