लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेली दीड वर्षे बंद असलेली रेल्वेची प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री आता पुन्हा सुरु झाली आहे. यामुळे प्रवाशांना व नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. आजवर पाहुण्यांना रेल्वेला सोडायला गेल्यावर स्थानकाबाहेरच थांबावे लागायचे, पण आता तिकीटविक्री सुरू झाल्याने थेट रेल्वेत जाऊन निरोप देता येणार आहे.
कोरोना व लॉकडाऊन काळात पुण्यासारख्या मोठ्या स्थानकांत प्रवाशांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवले होते. १० रुपयांच्या तिकिटाची किंमत थेट ५० रुपये केली होती. तिकीट दर वाढविल्याने प्रवाशांचे गरजेपुरतेच नातेवाईक स्थानकात येतील, नाहक गर्दी होणार नाही असा रेल्वेचा अंदाज होता.
बॉक्स
गर्दी वाढू लागली
- रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री पुन्हा सुरु केल्याने स्थानकांत गर्दी वाढू लागली आहे.
- मिरज, सांगली स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत १० रुपयेच आहे.
- त्यामुळे प्रवाशांना सोडायला येणारे नातेवाईक आता तिकिटासह स्थानकात येऊ लागले आहेत.
बॉक्स
दीड वर्षे तिकीट मिळतच नव्हते
रेल्वेने पुण्यासारख्या मोठ्या स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढविले. सांगली, मिरजेसारख्या छोट्या स्थानकांत मात्र वाढविले नाहीत, पण प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिकिटांची विक्रीच बंद केली. जनरल श्रेणी किंवा प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री करणाऱ्या खिडक्या बंदच राहिल्या. फक्त आरक्षण कक्ष सुरु होता. आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश मिळायचा. आता महिन्याभरापासून प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री पुन्हा सुरु केली आहे.
बॉक्स
सुरु असलेल्या रेल्वे
- कोयना एक्सप्रेस
- महाराष्ट्र एक्सप्रेस
- राणी चेन्नम्मा एक्सप्रेस
- यशवंतपूर - जोधपूर एक्सप्रेस
- हुबळी - दादर एक्सप्रेस
- गोवा - निजामुद्दीन एक्सप्रेस