सांगली : आर. आर. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी राज्यपातळीवर घेतला होता. त्यामुळे तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांना निवडून आणल्याबद्दल कोणी पावशेर ठेवण्याचे कारण नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील यांना पत्रकार बैठकीत लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने तटकरे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तासगाव तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीवेळी झालेली हाणामारी, संजयकाकांनी वारंवार केलेली टीका याला तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत आर. आर. पाटील आबांनी राज्यात अनेक विधायक कामे केली. गाडगेबाबा स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियानातून आबा घराघरांपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या पश्चात तासगावात वेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण तो कदापिही सहन केला जाणार नाही. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी राज्यपातळीवर घेतला होता. हा निर्णय जिल्हास्तरावर झालेला नव्हता. त्यामुळे कोणी आ. सुमनताई यांना निवडून आणल्याचे पावशेर ठेवण्याचे कारण नाही. तासगाव-कवठेमहांकाळच्या पाणीप्रश्नी सुमनतार्इंनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते, तरीही सरकारला जाग आलेली नाही. त्यांच्या पत्रावर जनतेला पाणी मिळाले तर आपले भवितव्य धोक्यात येईल, असे काहींना वाटते. ते म्हणाले की, भाजपच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळाकडे दुर्लक्ष होत आहे. तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी विविध कामांसाठी ४० हजार कोटींचे कर्ज काढले जाते. एलबीटी, टोल रद्द करून त्यासाठी कोट्यवधीची तरतूद होते; पण कर्जमाफीसाठी सात ते आठ हजार कोटी सरकारकडे नाहीत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत; पण केंद्राकडे अहवाल देताना केवळ तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दाखविले जाते. सिंचन योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार व दुष्काळी दौऱ्यावरून खा. शरद पवार यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना तटकरे म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास केवळ राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे चित्र रंगविले गेले; पण राज्यातील अनेक साहित्यिकांनी विरोध नोंदविला होता. त्याचा खुलासा करण्याची गरज होती. पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा ठाकरे यांचा आरोप बालीश आहे. त्यांना महाराष्ट्र व शरद पवार कळलेच नाहीत. पवारांनी पुरोगामी विचारांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही सोडण्याची तयारी दर्शविली होती. सरकारला बाहेरून पाठिंबा नाही विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंब्याची भूमिका घेतली होती; पण आता भाजप-शिवसेनेचे एकत्रित संख्याबळ १९० आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देणार नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना भाजपच्या विरोधातही आहे आणि सत्तेतही! शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे वारंवार दुटप्पी भूमिका घेतात. त्यामुळे सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही, असे म्हणत मध्यावधी निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळली. दुष्काळप्रश्नी १४ सप्टेंबरची डेडलाईन राज्यातील दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने १४ सप्टेंबरपर्यंत उपाययोजना हाती न घेतल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची घोषणा तटकरे यांनी केली. या मुदतीनंतर राज्यभर जेलभरो आंदोलन, मोर्चे काढले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
संजयकाकांनी पावशेर ठेवण्याचे कारण नाही!
By admin | Updated: August 22, 2015 00:57 IST