लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोटाला चिमटे काढून, शरीराचे हाल करून घेत कुणी गरिबीचे चटके सोसत असते, तर कुणी कर्तव्याच्या ओझ्याखाली दबत असते. अशा सर्व फिरस्त्यांच्या पोटासाठी ‘कोई भूका ना रहे’ अभियान सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. दररोज ६० हून अधिक लोकांना मोफत अन्न दिले जात आहे.
सांगली येथील बाबा सोशल ग्रुप व बाबा चौक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनी बाबा चौक येथे १६ फेब्रुवारी २०२१ पासून 'कोई भूका ना रहे’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. या मोफत अन्नछत्राचे उद्घाटन माजी शिक्षण सभापती पद्माकर जगदाळे सर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यामध्ये प्राधान्याने सफाई कर्मचारी, फिरते विक्रेते, वाटसरू, पोस्टमन, भुकेलेले यांना प्राधान्य देऊन दररोज ११ वाजल्यापासून ते जेवण संपेपर्यंत सकाळी एकवेळचे जेवण पुढील वर्षभर दि. १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मोफत देण्याची सोय करण्यात आलेली आहे.
ग्रुपचे अध्यक्ष नालसाब मुल्ला म्हणाले की, आमच्यासमोर लोकांचे पोटासाठी होणारे हाल आम्हाला पाहवले नाहीत. गरीब, गरजू व प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या लोकांच्या पोटासाठी काही तरी करण्याचा विचार आला आणि तो आम्ही कृतीत उतरविला. कर्तव्यभावनेतून आम्ही हे काम करीत आहोत.
यावेळी माजी नगरसेवक शेरू सौदागर, धनंजय पाटील, डॉ. सतीश नाईक, सचिन खांडेकर, आयुब पटेल, शकुर खान, बेडेकर गुरुजी, श्रीकांत लेंगरे, संदीप सपकाळ, सुरेश पुजारी आदी उपस्थित होते.
चौकट
सामाजिक कार्य आदर्शवत
जगदाळे म्हणाले की, वंचित, उपेक्षित घटकांसाठी कर्तव्यभावनेने केलेली समाजसेवा ही कौतुकास्पद व आदर्शवत आहे. मंडळाचे हे कार्य अन्नदान चळवळीला वेगळे स्वरूप देणारे आहे.