सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील चालक तथा वाहकांच्या ७६१ रिक्त पदांसाठी फेब्रुवारी २०२०मध्ये भरती झाली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने पात्र उमेदवारांना नियुक्तीच दिली नाही तसेच पात्र १०५ उमेदवारांना प्रशिक्षणही दिले नव्हते. त्यामुळे या उमेदवारांच्या रोजी-रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग येथे कोरोना काळात खबरदारी म्हणून नव्याने येणाऱ्या चालक-वाहकांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले होते. एस. टी. महामंडळात चालक-वाहक (ड्रायव्हर-कम-कंडक्टर) पदाच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केलेली होती. फेब्रुवारी २०२०मध्ये पात्र झालेले हे उमेदवार अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत असून, याबाबत अद्यापही महामंडळाने ठोस निर्णय घेतलेला नाही. पात्र ३९८ उमेदवारांपैकी २६१ उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यापैकी काहींना नियुक्ती आदेशही मिळाले होते. मात्र, कोरोनामुळे पुन्हा त्यांचे काम थांबवले होते. काेरोनाचे संकट कमी झाल्यामुळे सध्या प्रशिक्षण पूर्ण झालेल्या २६१ चालक तथा वाहकांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे एस. टी. महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, १०५ तरुणांची निवड होऊनही त्यांना प्रशिक्षण दिलेले नसल्यामुळे ते शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत.
चौकट
-जिल्ह्यासाठी चालक-वाहकांची गरज : ७६१
-अर्ज केलेल्यांपैकी निवड झाली : ३९८
-निवडीनंतर प्रशिक्षण पूर्ण : २६१
-प्रशिक्षण अर्धवट राहिलेले : १०५
चौकट
नियुक्ती दिल्यानंतर पुन्हा सेवा खंडित
कोट
फेब्रुवारी २०२०मध्ये नियुक्ती होऊन आता वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही शासनाकडून नियुक्ती आदेश नाहीत. काहींना सध्या नियुक्ती देण्याचे काम सुरु आहे. मी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.
- महादेव पवार, चालक-वाहक.
कोट
नोकर भरतीच्या यादीत पात्र झालो आहे. एस. टी. महामंडळाचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. तरीही महामंडळाकडून अद्याप नियुक्ती मिळालेली नाही.
- छोटू जाधव, नियुक्तीच्या प्रतीक्षेतील चालक-वाहक.
चौकट
प्रशिक्षण अर्धवटच
एस. टी. महामंडळाने आम्हाला निवडीचे पत्र दिले. परंतु, गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षण थांबले आहे. सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे महामंडळ प्रशिक्षण घेणार आहे.
- सुहास शिंदे, चालक-वाहक.
कोट
कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे एस. टी. महामंडळाने आमचे प्रशिक्षण घ्यावे, अशी आमची मागणी आहे. काही चालक-वाहकांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. आमचा नंबर कधी येणार, याच्या प्रतीक्षेत आहे.
- शिवाजी पाटील, चालक-वाहक.
कोट
कोरोनामुळे प्रशिक्षण थांबले होते. बसेस बंद असल्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या चालक-वाहकांना नियुक्ती दिली नव्हती. सध्या शासनाने प्रशिक्षण घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ज्यांचे प्रशिक्षण थांबले होते, त्यांचे प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे. आगारांच्या गरजेनुसार पात्र चालक-वाहकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- आलम देसाई, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.