इस्लामपूर : चार वर्षांपासून बहुतांशी नगरसेवक सर्वसाधारण सभा सोडली तर नगरपालिकेकडे फिरकलेसुद्धा नाहीत. काहीजण प्रभागांतील नागरिकांच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. आता वर्षावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक ‘जागरूक’ झाले असून, प्रभागात निधी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.
सध्या काही योजनांतून नगरपालिकेकडे निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये काही नगरसेवकांनी स्वबळावर निधी मिळविला आहे. या निधीच्या वाटणीसाठी सभागृहात वाद उफळला होता. सध्या शहरात दलित वस्तीच्या निधीचा वापर करून काही ठिकाणी रस्ते चालू आहेत, तर काही प्रभागांत रस्त्यांचा थांगपत्ता नाही. काही रस्ते नगरोत्थान योजनेतून केले जात आहेत. सत्ताधारी विकास आघाडीच्या नगरसेविका सुप्रिया पाटील, जयश्री पाटील, शकील सय्यद आणि राष्ट्रवादीचे डॉ. संग्राम पाटील यांच्या प्रभागात रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु भुयारी गटारीच्या कामाला अद्यापही मुहूर्त लागला नाही. त्यामुळे उपनगरांतील आणि मुख्य रस्त्यांची कामे होऊ शकलेली नाहीत.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि बांधकामे पाहता काही उपनगरांत अरुंद रस्ते आहेत. गटारीची कामे अपूर्ण आहेत. अशा प्रभागातील नागरिकांनी जलसंपदामंत्री पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. याची दखल पाटील यांनी घेऊन काही निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीवर विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा हक्क आहे, असा दावा केला जात आहे, तर हा निधी प्रत्येक प्रभागाला समान पद्धतीने द्यावा, अशी भूमिका सत्ताधारी विकास आघाडीतील नगरसेवकांची आहे. परंतु काही नगरसेवकांनी दबाब वापरून स्वत:च्या प्रभागातील रस्त्यांची डागडुजी आणि रस्ते करण्यास प्रारंभ केला आहे.
‘लोकमत’चा दणका
शहरातील विविध भागांत रस्त्यांच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला आहे. याची दखल घेऊन सत्ताधारी विकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात रस्त्यांची कामे सुरू केली आहेत.
फोटो- १२०१२०२१-आयएसएलएम- इस्लामपूूूर न्यूज
ओळ : महादेवनगर परिसरातील निर्मला सांस्कृतिक भवनसमोरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
लोगो : नगरपालिका