आदर्श आचरणासाठी आदर्श संस्काराची गरज असते. अशा आदर्श संस्कारातून घडलेले एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रकाश पाटील (दादा). समाजाच्या वेदनेचा जिव्हाळा जपत बाबा पाटील यांच्या निधनानंतर गावातील व परिसरातील सामान्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले. वडीलकीच्या नात्याने काम करताना त्यांचे आयुष्यच सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले. वारणा खोरे आणि वारणा खोऱ्यातील ऐतवडे खुर्दच्या कसदार मातीतील सुसंस्कृत कुटुंबात २६ मार्च १९५८ रोजी प्रकाश पाटील यांचा जन्म झाला. या संस्काराच्या मंदिरात ते लहानाचे मोठे झाले. वडिलांप्रमाणेच समाजसेवेचा गुण त्यांच्याकडे उपजतच हाेता. प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण वारणा मंदिरात झाले, तर उच्च शिक्षण राहुरी येथील कृषी विद्यापीठात झाले. कृषी पदवी पूर्ण करून यांनी एमबीएचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री दत्त सहकारी व राजारामबापू साखर कारखान्यात त्यांनी अनेक वर्षे कृषी विभागात नोकरी केली. नोकरीतला अनुभव घेऊन त्यांनी सहकार क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. सुसंस्कृत कुटुंबात वाढणाऱ्या बाबा पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबातील कोणालाही नोकरी न लावता त्यांनी गावातील व परिसरातील हजारो लोकांना नोकरी लावून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधत जीवनमान उंचावले. प्रकाश पाटील यांनी सहकार क्षेत्रात काम करण्याचे ठरवून संस्था प्रगतीपथावर नेली. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, पश्चिम महाराष्ट्र सहकारी मंडळ (पुणे), आरजीबी इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉपरेटिव्ह (नवी दिल्ली), प्राचार्य पी. बी. पाटील समाज विकास ट्रस्ट (सांगली), बाजीराव पाटील समाज विकास ट्रस्ट (ऐतवडे खुर्द), बाबा पाटील सर्व सेवा सोसायटी (ऐतवडे खुर्द), भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था (ऐतवडे खुर्द), दत्त वारणा पाणी पुरवठा संस्था, बुद्धी विकास वाचनालय (ऐतवडे खुर्द), अशा विविध सहकारी संस्थांमध्ये ते अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्यरत होते. बाबा पाटील ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शेकडाे विनामूल्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिरे घेतली. या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा केली. वारणा परिसरात समाजकार्य उभारले. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेतली. शेतकरी मंडळाच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक मार्गदर्शक व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. सहकार क्षेत्रात काम करताना सभासदांचे व समाजाचे हित पाहत संस्थेच्या आर्थिक उन्नतीत वाढ केली. इस्राईल, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, सिंगापूर असे अभ्यासू परदेशी दौरे केले. ते सतत संस्थेच्या व समाजाच्या कामात मग्न असत. समाजातील कोणताही घटक त्यांच्याकडे कामासाठी आला असता, शांतपणे त्याचे काम हातावेगळे करायचे. यामध्ये त्यांचा हातखंडा हाेता.
१६ फेब्रुवारी २०२० राेजी दिवसभराचे कार्यालयीन काम संपूवन ते घरी गेले. दुसऱ्या दिवशीच्या कामाचे नियोजन करत असताना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा वारसा उच्चशिक्षित असणारे त्यांचे चिरंजीव रोहित पाटील (भैय्या) चालवत आहेत.
माहीत नव्हते असे,
अचानक आपणास दूर नेईल,
आपल्या स्नेहाचा,
कर्तव्याचा, योगदानाचा,
सिंहाचा वाटा आमच्या अंतर्मनात राहील.
सुसंस्कृत व विविध सामाजिक कार्यक्षेत्रात
जेव्हा जेव्हा उल्लेख होईल,
तेव्हा आम्हाला दादा तुमची
पुन्हा पुन्हा आठवण येईल...
- राजेंद्र पाटील, कुरळप