घरांचा प्रस्ताव नियमित करावा, मागणीचे निवेदन कवठेमहांकाळचे नायब तहसीलदार किरण भिसे यांना महिलांनी दिले.
ढालगाव : चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील गायरानमध्ये गेल्या ४० वर्षांपासून बांधण्यात आलेल्या घरांचा प्रस्ताव शासनाने नियमित करून याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन महिलांनी नायब तहसीलदार किरण भिसे यांच्याकडे दिले.
गट नं. ११४४ मध्ये गेल्या ४० वर्षांपासून आम्ही घरे बांधली आहेत, परंतु ग्रामपंचायतीकडून घरे काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
गावामध्ये कुठेही जागा नाही, त्यामुळे आमच्या वाडवडिलांनी व आम्ही घरे बांधली. शिवाय आम्ही ग्रामपंचायतीकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत आहोत. असे असताना ग्रामपंचायत घरे काढण्याच्या नोटिसा देत आहे.
अतिक्रमण केलेली घरे नियमित करावीत, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव त्वरित मंजूर व्हावा.
घरे वाचविण्यासाठी महिला मोठ्या संख्येने कवठेमहांकाळ तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये आल्या होत्या. आपला संसार आणि मुलाबाळांचे भविष्य वाचवावे, अशा मागण्या या महिला करीत होत्या.