इस्लामपूर : सांस्कृतिक क्षेत्रातील कुशल संघटक हरपला. त्यांच्या अकाली जाण्याने सांस्कृतिक क्षेत्राची हानी झाली, या शब्दात आविष्कार कल्चरल ग्रुपचे सचिव राजेंद्र घोरपडे यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांचा शोक संदेश वाचून दाखविण्यात आला.
घोरपडे गेल्या दोन दशकापासून आविष्कार कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून कार्यरत होते. एक संघटक अशी त्यांची सांस्कृतिक क्षेत्रात ओळख होती. अडल्या- नडलेल्यांना मदतीचा हात देणारे ते एक दिलदार मित्र होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या भाऊंचा सामाजिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग होता. या शब्दात नगरसेवक खंडेराव जाधव, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, सरव्यवस्थापक एस. डी. कोरडे, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सर्जेराव देशमुख, सरपंच बाबूराव पाटील, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, आविष्कार कल्चरल ग्रुपचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, डॉ. अतुल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले, जयप्रकाश महाडिक यांच्यासह मान्यवरांनी घोरपडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे, संजीव पाटील, मोहन चव्हाण, एम. जी. पाटील, संजय बनसोडे, सुनील सावंत, सदानंद पाटील, राजवर्धन लाड, अजित थोरात, सतीश पाटील, नजीर शेख, भूषण शहा यांच्यासह आविष्कार परिवार तसेच राजारामबापू समूहातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र व नातलग उपस्थित होते.