लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू सहकारी बॅँकेला वर्षात ४० कोटी ५७ लाख रुपयांचा निव्वळ नफा, तर आयकरासह इतर तरतूद वजा जाता १४ कोटी ५५ लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रतिसेवक व्यवसाय नऊ कोटी ७० लाख इतका असून, निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाचा फटका बसूनही बँकेने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ४१ कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे. बॅंकेकडे २१६७ कोटींच्या ठेवी असून, १४४२ कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे.
ते म्हणाले, २५ टक्के सानुग्रह अनुदानाची तरतूद केली आहे. यावर्षी रिझर्व्ह बॅँकेच्या परवानगीने चांगला लाभांश देणार आहोत. बॅँकेने छोटी कर्जे देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी उपाध्यक्ष जनार्दन पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. जाखले, महासरव्यवस्थापक आर. ए. पाटील, डॉ. दीपा देशपांडे, बाबूराव हुबाले उपस्थित होते.