आष्टा : राष्ट्राची प्रगती युवकांच्या हाती आहे. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण देणे गरजेचे आहे. युवा पिढीला सावरण्याचे काम पालक, शिक्षक व समाजाने करावे. अन्याय, अत्याचार याविरोधात त्याला चीड यायला हवी, असे प्रतिपादन प्रा. अस्लम फकीर यांनी केले.
आष्टा (ता. वाळवा) येथील झुंझारराव पाटील युवा मंचच्या वार्षिक सभेवेळी फकीर बोलत होते. माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, राजू पाटील, पोपट माळी, गौतम धनवडे, प्रदीप ढोले, केशव माळी, सचिन मोरे उपस्थित होते. यावेळी दिनकर बसुगडे यांची पश्चिम भाग सर्व सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, रोहित चौगुले, फरिदा रफिक इनामदार, ऐश्वर्या अण्णासाहेब वाजे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी समर्थ मोरे व वरदराज पाटील यांनी वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम युवा मंचला देणगीस्वरुपात दिली. गौतम धनवडे यांनी स्वागत केले. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप ढोले यांनी आभार मानले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.