दिलीप मोहिते --विटा -मुत्सद्दी राजकारणी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी विट्यात खानापूर मतदार संघातील परस्परविरोधी सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आणून ‘जयंतनीती’चा वापर केला, पण कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी मात्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत राजकीय पालकत्वाचे ‘शिवाळ’च त्यांच्या खांद्यावर ठेवले. जयंतरावांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे ‘वावटळ’ उठवून सदाभाऊंनी ‘कदम’ कॉँग्रेसवरही निशाणा साधला.येथे राजारामबापू बॅँकेच्या शाखेचे उद्घाटन शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्याहस्ते झाले. यावेळी सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. सदाभाऊ वगळता सर्वजण पूर्वीचे राष्ट्रवादीचेच नेते! पण पक्ष बदलला म्हणून व्यक्तिगत संबंध कधी बिघडत नाहीत, असे सांगत जयंतरावांनी त्यांना एका व्यासपीठावर आणले.जयंतरावांच्या हाकेला हाक देणाऱ्या दिग्गजांच्या सदाभाऊ नवखेच! त्यांनी राजारामबापू व लोकनेते हणमंतराव पाटील यांच्यातील संबंधांचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर त्यांनी जयंतरावांवर कौतुकाचा वर्षाव करत खानापूर मतदारसंघाच्या नैतिक, सामाजिक व राजकीय पालकत्वाचे ‘शिवाळ’ जयंतरावांच्या खांद्यावर ठेवले. त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे सांगून राजकीय क्षेत्रात वावटळ उठविले. बाहेरच्या लोकांसाठी विटा धार्जिण असल्याचेही सांगितले. या वक्तव्यानंतर विटा नगरपरिषदेसाठी मोर्चेबांधणी करणारे आ. बाबर यांच्यासह उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे सदाभाऊंना आ. बाबर यांच्याकडे पाहत ‘बाहेर’च्या म्हणजेच ‘जिल्ह्याबाहेर’च्या लोकांसाठी विटा धार्जिण असल्याचे सांगावे लागले.तुम्ही आमचेच आहात!राजेंद्रअण्णांनी, सर्व वक्रीय ग्रह जयंतरावांनी एका व्यासपीठावर आणल्याचे सांगितले. आ. बाबर यांनी तर, जिल्ह्यातीलच काय, राज्यातील सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आणण्याची धमक जयंतरावांत असल्याचे सांगितले. त्यानंतर, पक्ष बदलला म्हणून व्यक्तिगत संबंध बिघडत नाहीत. झाडाने सावली दिली नाही म्हणून आपण त्याच्यावर रागवायचे नसते. कारण ते अन्य कोणाला तरी सावली देतच असते, असे सांगून, राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांना, ‘तुम्ही आमचेच आहात’, असे सांगण्याचा प्रयत्न जयंतरावांनी केला.
राजकीय पालकत्वाचे ‘शिवाळ’ जयंत पाटील यांच्या खांद्यावर!
By admin | Updated: May 24, 2016 00:53 IST