फोटो-३००४२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज
बहे रोडवरील मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्यावर कारवाई करताना पोलीस.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरात भाजी मंडईच्या नावाखाली रस्त्यावरच बाजार भरतो. यावर पोलिसांनी कारवाई करूनसुद्धा रस्त्यावरील रहदारी कमी होत नाही. त्यामुळे शहरासह परिसरात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील मृत्युदराचा आलेखही वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या सात दिवसांसाठी वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता आहे.
१५ एप्रिलपासून १ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला होता. यामध्ये सकाळी ७ ते ११ पर्यंत किराणा, भाजीपाला आदी व्यवहार सुरू होते. परंतु शहरातील प्रमुख रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. यावर पालिका प्रशासनाने वेळोवेळी निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा रस्त्यावरील गर्दी हटली नाही. ३० एप्रिल रोजी पोलीस आणि पालिका प्रशासनाने भाजी विक्रेत्यांच्यावर कडक कारवाई करून विक्रेत्यांना फिरून आपला माल विकावा, असा आदेश दिला. तरी सुद्धा बहुतांशी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून असल्याने पुन्हा रस्त्यावर जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहर व परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या तालुक्यात शासकीयसह १४ कोरोना सेंटर कार्यरत असून याठिकाणी ३४५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण कोल्हापूर, मिरज येथे उपचारासाठी आहेत. दैनंदिन कोरोनाचा वाढता आलेख पाहता बहुतांशी रुग्ण घरामध्येच उपचार घेत आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे सर्वच प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चौकट
तीन दिवसात ३० बळी
जिल्ह्यात वाळवा तालुक्याचा मृत्युदर अधिक असल्याचा दिसून येत आहे. बुधवार दि. २८ ते ३० एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्लामपूर शहरातील ६ जणांचा समावेश असून उर्वरित वाळवा तालुकासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. ही परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे येणारे सात दिवस कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.