सांगली : राज्यात लाॅकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढला आहे. व्यापाऱ्यांनी या निर्णयाला सहकार्य केलेच आहे. पण दुसरीकडे व्यापारी वर्ग शेवटची घटका मोजत आहे. आमदार, खासदारासह लोकप्रतिनिधींनी व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे. हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी गुरुवारी केली.
उद्ध्वस्त महापालिकेने किमान एक वर्षासाठी व्यावसायिक घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, व्यवसाय परवाना शुल्क पूर्ण माफ करावा, नोंदणी निःशुल्क करावी. शासनाने मार्च ते मे या तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, कोविडमुळे मृत व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांनी मदत द्यावी. बँक आणि वित्तीय संस्थांनी या आर्थिक वर्षातील व्याज माफ करावे व अल्प दरात कर्ज वितरण करावे. जीएसटी भरण्यासाठी वाढीव वेळ मिळावा, सर्व दंडात्मक कारवाही रद्द कराव्यात, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
चौकट
व्यापाऱ्यांचा छळ
कोरोनाच्या संकटात काही व्यापाऱ्यांना प्रशासनातील अधिकारी त्रास देत आहे. मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग होत आहे. अशा तक्रारी असोसिएशनकडे आल्या आहेत. आम्ही सर्व पुराव्यानिशी याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख व राज्याचे पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहोत. तसेत राज्य संघटनेमार्फत लेखाजोखा मांडणार आहे. व्यापारी अडचणीत असताना टाळूवरचे लोणी खायचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.