अभिषेक हा जीओ कंपनीचा कर्मचारी होता. याच्या मृत्यूबाबत मिरज शहर पोलिसात नाेंद असून पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेने मृत अभिषेक सावंत याच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जीओ मोबाईल कंपनीने ४० लाख रुपये नुकसानभरपाई आठ दिवसात द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. आठ दिवसात मदत दिली नाही तर जीओ कंपनीच्या केबल्स तोडून टाकण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष डाॅ. महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर महापालिकेच्या ड्रेनेज वाहिनीसाठी १२ फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. तुटलेली केबल जोडण्यासाठी अभिषेक सावंत हा या खड्ड्यात उतरला असता मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर कोसळला. अभिषेक यास काढण्यासाठी जेसीबीने ढिगारा बाजूला करताना जेसीबीचे बकेट लागून अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेकच्या मृत्यूस जीओ मोबाईल व महाराष्ट्र प्राधिकरणाचा ठेकेदार जबाबदार आहे. अभिषेक हा वयाच्या १५ व्या वर्षांपासून जीओ कंपनीकडे काम करत होता. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून त्याच्यावर आई, वडील व दोन बहिणी अवलंबून होत्या. त्यामुळे सावंत कुटुंबीयांना ४० लाख रुपये देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.