प्रशासकीय यंत्रणा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यात आटोकाट प्रयत्न करते आहे. दंडात्मक कारवाई, दुकानांचे वेळेत उघडणे आणि बंद करणे, विनामास्क वाहन चालकांवर पोलीस यंत्रणा करडी नजर ठेवून असली तरी, नियमांचा भंग करणे हा जणू आपला जन्मसिद्ध अधिकारच असल्यासारखे काही नागरिक वागत आहेत.
शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक सोडून बाकीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय असतानाही काही व्यावसायिक मागच्या दाराने, तर काही नवनवीन क्लुप्त्या काढून व्यवसाय करत आहेत. यामुळे कोरोनाच्या प्रसारात वाढ होत आहे. याचे त्यांना यत्किंचितही गांभीर्य नाही.
आजवर तालुक्यात कोरोनाचे ६५२६ रुग्ण आढळले आहेत. ५७६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ५५९ रुग्ण उपचार घेत आहेत. हा आकडा जरी समाधानकारक दिसत असला तरी अजूनही नागरिकांनी सतर्कता बाळगावी. कोणी तरी सांगितल्यावर नियम पाळण्यापेक्षा स्वेच्छेने नियमांचे पालन केले, तर प्रशासनावरील बराचसा ताण कमी होईल.