अशोक पाटील -इस्लामपूर -लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्याविरोधात आपली भूमिका नरमाईची ठेवत काँग्रेसला उमेदवारी दिली. तेव्हापासून वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीला घरघर लागली आहे. विधानसभेला शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना चांगलाच झटका बसला आहे. तर इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील विक्रमी मतांनी विजयी झाले असले तरी, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बहुतांशी नेत्यांनी भाजप, शिवसेनेशी घरोबा केला आहे. त्यामुळे आगामी काळात जयंत पाटील यांची भूमिका काय राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.विधानसभा निकालानंतर जयंत पाटील हे अज्ञातवासात गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिराळा मतदारसंघातील ४८ गावांत राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसला आहे. याच परिसरातील कुरळपचे पी. आर. पाटील यांच्याकडे राजारामबापू सह. साखर कारखान्याची धुरा आहे. वाटेगावचे रवींद्र बर्डे वाळवा पंचायत समितीचे सभापती आहेत. तांबव्याचे नेताजी पाटील यांना राजारामबापू दूध संघाचे अध्यक्षपद दिले आहे. याच गावचे लिंबाजी पाटील हे जि. प. चे उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. कासेगाव शिक्षण संस्थेवर कासेगावचेच शामराव पाटील आहेत. देवराज पाटील यांना कमी वयातच जि. प. च्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. याव्यतिरिक्त राजारामबापू उद्योग समूहात जास्तीत-जास्त कार्यकर्त्यांना संधी देऊनही ४८ गावांत मानसिंगराव नाईक यांना बसलेला फटका जयंत पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना वाळवा-शिराळ्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला होता. तेव्हापासून जिल्ह्यासह राज्यातील त्यांचे नेतृत्व भक्कम होत गेले. त्यानंतर ऊस आंदोलन, सांगली महापालिकेत केलेला शिरकाव, जिल्ह्यातील राजकारणात केलेल्या कुरघोड्यांमुळेच राष्ट्रवादी बॅकफूटवर पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.वाळवा-शिराळा तालुक्यांसह जिल्ह्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी जयंत पाटील यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केलेले प्रयत्न फसले आहेत. काही ठिकाणी मात्र त्यांना यश आले आहे. जयंत पाटील उच्चांकी मतांनी विजयी झाले असले तरी, त्यांना सत्तेत स्थान मिळणार नाही. त्यांच्याच बरोबर काम करणारे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचेही भवितव्य अंधारात आहे.वैभव नायकवडी हुशार..! हुशार नेता म्हणून वैभव नायकवडी यांचे नाव घेण्यास हरकत नाही. ते काळानुसार भूमिका बदलताना दिसतात. कधी नागनाथअण्णांच्या कार्याचा गवगवा करतात, तर कधी काँग्रेसच्या नेत्यांची वाहवा करतात. मध्येच त्यांना राष्ट्रवादीचाही पुळका येतो. यामुळे ते नेमके कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत, हे कोणीही सांगू शकत नाही. परवा तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासोबत त्यांनी नागनाथअण्णांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यामुळे त्यांचे भाजपवरील प्रेम उफाळले का? असाही सवाल उपस्थित होत आहे. घडतंय ते जयंतरावांमुळेच..!वाळवा-शिराळ्यात काहीही घडो, ते जयंत पाटीलच घडवतात, अशी हवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून जयंत पाटीलच प्रयत्न करणार आहेत. सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू नये यासाठी पाटील यांचाच डाव आहे. जिल्ह्यातील सर्व समर्थक भाजप, शिवसेनेत घालवण्यात पाटील यांचाच हात आहे. सध्या पाटील यांच्या पाठीशी ९ आमदार असल्याचीही चर्चा तालुक्यात घुमू लागली आहे.वाळवा-शिराळ्यासह जिल्ह्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी पाटील यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केलेले प्रयत्न फसले आहेत. ते उच्चांकी मतांनी विजयी झाले असले तरी, त्यांना सत्तेत स्थान मिळणार नाही.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचेही भवितव्य अंधारात आहे.
पाटस ग्रामपंचायत बरखास्त
By admin | Updated: October 27, 2014 23:00 IST