सांगली : आध्यात्मिक भाववाहिन्याही ब्लॉक करुन कोरोना अजूनही जिल्ह्यात दुसरी लाट घेऊन उभा आहे. काही दिवसांचा अपवाद वगळता गेल्या दीड वर्षांपासून मंदिरांचे दरवाजे सतत बंद आहेत. एकीकडे मंदिरावर अवलंबून असणारे अर्थचक्र थांबले असताना दुसऱ्या बाजूने आध्यात्मिक परंपरेलाही लोक मुकले आहेत. त्यामुळे ‘उघड दार देवा आता’ असा धावा करण्यास सर्वांनी सुरुवात केली आहे.
सांगलीलाही आध्यात्माची मोठी परंपरा लाभल्याने येथे मंदिरे, मठांची संख्या मोठी आहे. सांगलीचे पंचायतन गणपती मंदिर मानाचे व सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिरावर अवलंबून असलेली उलाढालही मोठी आहे. मंदिरांचे पुजारी, कर्मचारी, मंदिर व्यवस्थापन, पूजा साहित्य व अन्य साहित्यांचे विक्रेते या सर्वांच्या आयुष्यातील अर्थद्वारही त्यामुळे बंद झाले आहे. व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने आता सुरु झाली, मात्र मंदिरावर अवलंबून असणाऱ्यांनी संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरांचे दरवाजे प्रत्येक अनलॉकमध्ये सर्वात शेवटी उघडले जात असल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांच्या आयुष्यातील प्रश्नांची कोंडी अधिक तीव्र होत आहे.
चौकट
कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प
सांगलीत पंचायतन गणपती मंदिरासह स्वामी समर्थ मंदिर, मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, विश्रामबाग गणपती मंदिर अशा मोठ्या मंदिरांचा समावेश आहे. याठिकाणी दरमहा २.५ कोटींची उलाढाल होत असते. ही उलाढाल गेले वर्षभर ठप्प आहे.
चौकट
खर्च भागविणार तरी कसा
मोठ्या मंदिरांचा महिन्याचा खर्च ५ ते ७ लाख, मध्यम मंदिरांचा २० ते २५ हजार तर छोट्या मंदिरांचा १० हजाराच्या घरात आहे. विद्युत बिल, सेवा-सुविधा, कर्मचाऱ्यांचा पगार, आदी गोष्टींवर हा खर्च होत असतो.
कोट
भाविकांविना मंदिरांची कल्पनाच करवत नाही. कित्येक वर्षांची आध्यात्मिक परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. नियमांचे पालन करावेच लागेल, पण मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांचा प्रश्न तसेच आध्यात्मिक आधाराचा प्रश्नही सुटणे महत्त्वाचा आहे.
- अमोल गिरी, पुजारी, सांगली
कोट
गेल्या दीड वर्षापासून सतत मंदिर बंद आहे. राजगिरा लाडू व अन्य मिठाई साहित्य विक्री करुन आमचे घर चालते. मंदिर बंद असल्याने आमची आर्थिक कोंडी झाली आहे.
- सोपान जाधव, विक्रेते, सांगली
कोट
देवाच्या दारात बसून घर चालवताना कधीही अडचणी आल्या नाहीत. जसे दरवाजे बंद झाले तसे अडचणींनी घर करण्यास सुरुवात केली.
- कमल बरगाले, फुलविक्रेत्या, सांगली