इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला असणाऱ्या एक गावातील अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा दोघांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० पासून सुरू होता. पीडितेला हा त्रास असह्य झाल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. १९ वर्षीय पीडित विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे.
अंकुश वसंत मंडले आणि सुरज संभाजी जाधव (रा. माणिकवाडी. ता. वाळवा) या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे. महिलेचे लग्न जून २०२० मध्ये झाले आहे. ३१ ऑगस्टला अंकुशने पहिल्यांदा तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर १३ सप्टेंबरच्या रात्री सुरजने तिचा विनयभंग केला. १७ नोव्हेंबरला सुरजने तू मला आवडतेस, तू माझ्याशी बोल नाही तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. त्यावर अंकुशने पुन्हा २५ नोव्हेंबरला तिचा विनयभंग केला. या त्रासाला कंटाळून तिने साेमवारी पोलिसांत दोघांविरुद्ध फिर्याद दिली.