आर. एन. बुरांडे - पलूस -पलूस तालुक्यात एकेकाळी मजबूत स्थितीत असलेल्या राष्ट्रवादीला आता अखेरची घरघर लागली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख महायुतीच्या वाटेवर आहेत, तर अरुण लाड राष्ट्रवादीवर नाराज आहेत. माजी तालुकाध्यक्ष बाबा पाटील-घोगावकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे दुसरा मातब्बर नेता नाही. विद्यमान तालुकाध्यक्ष व पलूस पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह फडनाईक आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती विठ्ठलराव येसुगडे हे सध्यातरी शांत आहेत. तालुक्यात वजनदार नेता नसल्याने राष्ट्रवादीला घरघर लागल्याचे चित्र आहे.कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. या संघर्षात कॉँग्रेसवर नाराज असणाऱ्यांचे पाठबळ देशमुखांना मिळत असे. त्यामुळे डॉ. कदम आणि देशमुख यांच्यात तुल्यबळ लढती झाल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपला मिळालेले यश आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव यामुळे, पदे आणि सत्तेच्या वर्तुळात वावरणाऱ्यांना महायुती जवळची वाटू लागली आहे.देशमुख महायुतीच्या वाटेवर आहेत, तर राष्ट्रवादीचे दुसरे नेते अरुण लाड पक्षावर नाराज आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ. कदम, देशमुख आणि लाड यांच्यात एक अलिखित करार ठरला होता आणि त्याची वाच्यता डॉ. कदम यांनी केली होती. डॉ. कदम यांना विधानसभा मतदरसंघातून विजयी करायचे, तर देशमुख यांना विधानपरिषदेवर पाठवायचे आणि अरुण लाड यांना पदवीधर मतदारसंघातून निवडून आणून त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचे, असा हा करार असल्याचे सांगितले जात होते. साहजिकच त्यामुळे हे तिन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात अनेकदा एकत्र दिसत. परंतु राष्ट्रवादीने अरुण लाड यांना पदवीधरची उमेदवारी देण्याचा शब्द आयत्यावेळी बदलला. त्यामागे या तिन्ही नेत्यांमधील राजकीय सामंजस्य हेच कारण होते. दुसरे कारण म्हणजे डॉ. कदम यांच्या कार्यकर्त्यांनी लाड यांच्या पदवीधरांच्या मतदार नोंदणीला केलेली मदत. यामुळे राष्ट्रवादीने शब्द बदलला. उमेदवारही बदलला आणि मतात विभागणी होऊन लाड यांचा पराभव झाला. या पराभवाचे शल्य असल्याने लाड राष्ट्रवादीवर नाराज आहेत. आमणापूरचे आर. एम. पाटील, युवक राष्ट्रवादीचे गिरीश गोंदील, शहराध्यक्ष दिगंबर पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, माजी जि. प. सदस्या सुरेखा लाड, सूर्यकांत बुचडे आदी कार्यकर्ते बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे शांत राहणेच पसंत करत आहेत. परिणामी तालुक्यात कॉँग्रेसइतकाच प्रबळ असणारा राष्ट्रवादीला तालुक्यात अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे.तुल्यबळ नेता नाही!राष्ट्रवादीचे तालुक्यातील मातब्बर नेते बाबा-पाटील घोगावकर यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादी एकसंध ठेवणारा तुल्यबळ नेताच उरलेला नाही. पलूसमधील माजी जिल्हा परिषद सभापती विठ्ठलराव येसुगडे आणि पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह फडनाईक हे या विभागातील राष्ट्रवादीच्या विजयाचे शिल्पकार मानले जातात. तेसुद्धा सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शांत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये तालुक्यात दखलपात्र आणि निष्ठावान नेता उरलेलाच नाही.
पलूसमध्ये राष्ट्रवादीला घरघर
By admin | Updated: September 23, 2014 23:57 IST