मिरज : महापालिका क्षेत्रात खराब रस्ते, अपूर्ण पाणी योजना यामुळे मिरज शहराची बकाल अवस्था निर्माण झाली आहे. यास महापालिकेचे प्रशासन जबाबदार असून, येत्या पंधरा दिवसात शहरातील रस्ते दुरुस्त न केल्यास महापालिकेस टाळे ठोकण्याचा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी मिरजकर नागरिकांच्या बैठकीत दिला.
मिरजेत जनता दलातर्फे शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती व मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी मिरजकर नागरिकांची बैठक पार पडली, यावेळी प्रा. शरद पाटील बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते, दिवे, पाणी या नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरविण्यास महापालिका असमर्थ ठरली असून खराब रस्त्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मिरज शहराच्या दुरवस्थेस महापालिकेचे प्रशासन जबाबदार आहे. येत्या पंधरा दिवसात रस्ते दुरुस्ती न केल्यास व प्रलंबित पाणी योजनेचे काम पूर्ण न केल्यास जनता दलातर्फे महापालिकेस टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी प्रा. शरद पाटील यांनी दिला.
यावेळी ज़िल्हा जनता दलाचे अध्यक्ष ॲड. के. डी. शिंदे, ॲड. शब्बीर आलासे, ॲड. फैयाज झारी, राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, अशोक पाटील, डॉ. ए. आर. कुलकर्णी, शशिकांत गायकवाड, इकबाल बारगीर, जनार्धन गोंधळी यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी महापालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. प्रा. सलीम सय्यद यांनी आभार मानले.