मानाजी धुमाळ
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेठरे धरण : पाडळी (ता. शिराळा) येथे शनिवारी सकाळी विजेच्या धक्क्याने सख्ख्या चुलत भावांचा अंत झाला. आठवड्याभरात गावातील चार कर्त्या युवकांचा वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
मागील आठवड्यात येथील प्रदीप आनंदा पाटील (वय ४३) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ते विश्वास सहकारी साखर कारखान्यावर सुरक्षा कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. चार दिवसांपूर्वी नवी मुंबई येथे एका खासगी कंपनीत काम करणारे संजय विश्वास पाटील (वय ३८) या युवकाचे निधन झाले. संजय हा उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होता. मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
या दोन घटना ताज्या असतानाच शुक्रवारी सकाळी मानसिंग बबन पाटील व जयकर सर्जेराव पाटील या सख्ख्या चुलत भावांचा पाडळीवाडी रस्त्याच्या दक्षिणेला असणाऱ्या मोरणा धरणात पाण्यात अडकलेल्या मोटरी काढत असताना विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. मानसिंग पाटील हा अविवाहित असून तो विराज इंडस्ट्रीज, शिराळा येथे कामास होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे, तर जयकर पाटील याचा मुंबई येथे शुद्ध पाण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. या दोघांच्या मृत्यूने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयकर हा दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त पाडळी येथे आला होता. कुटुंबाचा आधार असणाऱ्या चार उमद्या व कर्त्या युवकांच्या मृत्यूने त्या कुटुंबातील वृद्ध आई-वडील, पत्नी व लहान मुले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.