फोटो : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील ठिबक प्रकल्पाच्या पाहणीवेळी कृषिमंत्री दादा भुसे, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आंबीटकर यांना विनायक पाटील यांनी प्रकल्पाची माहिती दिली.
गोटखिंडी : धरणे बांधणे, पाणी आडवणे यातून उपलब्ध पाण्यावर जास्तीत जास्त शेतीचे क्षेत्र ओलिताखाली कसे येईल, याबाबत महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
गोटखिंडी (ता. वाळवा) येथे गेले दहा वर्षांपासून सहाशे एकरावर ठिबक सिंचन प्रणाली यशस्वी चालू आहे. या प्रकल्पाची पाहणी मंत्री दादा भुसे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आंबीटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, राजारामाबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री भुसे म्हणाले की, येणाऱ्या खरीप पिकांच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते किती लागतील, त्याची विक्रीची व्यवस्था कशी आहे व काय करायला पाहिजे, यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. कमी पाण्यावर सहकार तत्त्वावरील व मोठ्या क्षेत्रावरील ठिबक प्रकल्प आंध्र प्रदेशात आहेत. त्याचबरोबर गोटखिंडी येथील महादेव पाणीपुरवठ्याचा सहाशे एकरावरील यशस्वी प्रकल्पाची माहिती मिळाल्याने या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
संस्थेचे विनायक पाटील यांनी ठिबक प्रकल्पाची माहिती दिली. सेंद्रिय शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त सचिन येवले व अमर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विभागीय कृषी संचालक उमेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, आनंदराव टिबे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लालासाहेब थोरात, संजय माने, सचिव प्रवीण जाधव यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.