कसबे डिग्रज : गेली कित्येक वर्ष मिरज पश्चिम भागाचे सांगलीशी नाते जोडणारा कृष्णा नदीवरील आयर्विन पूल उभा आहे. परंतु, तो आता जीर्ण झाल्याने नवीन समांतर पूल उभा करावा, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.
मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील कसबे डिग्रज, तुंग, समडोळी, कवठेपिरान, दूधगाव आदी गावांसह आष्ट्याचा नित्य संपर्क आयर्विन पुलावरून सांगलीशी आहे. बायपास पूल झाला तरीही या भागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण यांना कायमस्वरूपी आयर्विन पूलच सोयीस्कर होता.
सध्या दुरुस्तीसाठी आयर्विन पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मिरज पश्चिम भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. नागरिकांना बायपास रस्ता व पुलाचा वापर करुन सांगलीत जावे लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा, आणि अंतर वाढले आहे.
या सर्वप्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून आयर्विन पुलाला पर्यायी समांतर पूल गरजेचा आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना सांगलीशी नित्य संपर्क ठेवणे सोयीचे होणार आहे.
चौकट
मिरज पश्चिम भागातील सुमारे दोन पिढया आयर्विन पुलावरूनच सांगलीशी जोडल्या गेल्या आहेत. नवीन बायपास पूल असला तरी नित्य संपर्क याच आयर्विन पुलावरून होतो. हा पूल जुना झाल्याने नवीन समांतर पूल ही काळाची गरज आहे. शासनाने लवकरच नवीन पुलाचे काम सुरू करावे, याकरिता पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
- आनंदराव नलवडे
नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, कसबे डिग्रज