लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : मसुचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत कट्टर विरोधक गुरू-शिष्य तब्बल २० वर्षांनी एकत्र आले; तरीही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोघांना अपयश आले आहे. हे दोघे पुत्रप्रेम व पुतण्याच्या प्रेमामुळे एकत्र आल्याने व हुतात्मा गटाला डावलल्याने ही निवडणूक लागल्याची चर्चा आता रंगली आहे.
मसुचीवाडी ग्रामपंचायतीत एकूण ११ जागा आहेत. यातील ९ उमेदवार याआधी बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित दोन जागांसाठी वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी मसुचीवाडी ग्रामपंचायतीत कायमच गुरू-शिष्य यांची काटालढत जिल्हयाने पाहिली आहे. यात गुरू पंचायतीचे माजी सदस्य दत्तूआप्पा खोत व शिष्य ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सर्जेराव कदम यांनी २० वर्षे मोठा संघर्ष केला. यातून शत्रुत्वाशिवाय काहीच भेटत नाही, हे समजल्यावर एकत्र येण्याचा निर्णय झाला. मात्र दुखावलेले कार्यकर्ते व हुतात्मा गट यांनी वॉर्ड चारमध्ये निवडणूक लावली.
ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी डोकी फोडून, भाऊबंदकीचा विरोध पत्करला, तिथे हे दोघे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आल्याचे बोलले जात आहे. दत्तूआप्पांनी आपल्या मोठया मुलग्याला संजय कदम याला बिनविरोध केले, तर सर्जेराव कदम यांनी आपला पुतण्या शांताराम कदम याला बिनविरोध केल्याने, हे दोघे आपल्या घरात सरपंचपद बिनसंघर्षाचे यावे, या स्वार्थासाठी एकत्र आल्याची सध्या चर्चा आहे. म्हणूनच दुखावलेले कार्यकर्ते व हुतात्मा गट यांनी एका वॉर्डात निवडणूक लावल्याचे बोलले जात आहे.
चाैकट
यांची भूमिकाही महत्त्वाची
भरीस भर म्हणून रयत आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष भास्कर कदम यांचीही मोठी अडचण आहे. गतवेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आयत्यावेळी त्यांच्या पत्नीला सरपंचपद डावलले होते. त्याचा राग आजही त्यांच्या मनात आहे. त्याचा डाव भास्कर कदम यावेळी काढणार का? यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.