बुधगाव : महिन्यातील मोजकेच दिवस सुरू असणारी माधवनगरसह सात गावांची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना फेबु्रवारीच्या सुरुवातीलाच (दि. २) गळतीमुळे बंद आहे. योजनेतील सहभागी गावांमध्ये पाण्यासाठी नेहमीप्रमाणेच धावपळ सुरू आहे.माधवनगरसह, बुधगाव, कवलापूर, बिसूर, रसूलवाडी, कांचनपूर आणि सांबरवाडी या सात गावांसाठी युती सरकारच्या काळात प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यानंतर २००० पासून योजना कार्यान्वित झाली. मात्र जलवाहिन्यांच्या निकृष्ट कामांमुळे सुरुवातीपासूनच एखादा संपूर्ण महिनाही योजना विनातक्रार चालली नाही. यामध्ये भरीस भर म्हणून वाढीव वीज बिलाच्या ओझ्याने योजनेचा श्वासच गुदमरतोय! थकबाकीच्या कारणावरूनही प्रत्येक महिन्याला योजना काही दिवस हमखास बंदच असते. यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून योजनेतील माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर या मोठ्या गावांनी स्वतंत्र पाणी योजनांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र स्वतंत्र योजनांना मंजुरी व कामानंतर सुरळीत पाणीपुरवठ्याचे स्वप्न आणखी काही वर्षे तरी स्वप्नच राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या डिग्रज (मौजे) जवळ दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. यापैकी सोमवारी एक गळती काढण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
माधवनगर प्रादेशिक योजना पुन्हा पडली बंद
By admin | Updated: February 2, 2015 23:41 IST