येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मॄती व्याख्यानमालेत शिवशाही ते लोकशाही... या विषयावर संदीप जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : बुद्धिजीवी पिढी घडविण्यासाठी व समाजाला योग्य दिशा देण्यासाठी साहित्यिकांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप (नाशिक) यांनी केले.
ते येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवशाही ते लोकशाही...’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा पं. स. चे उपसभापती नेताजीराव पाटील होते.
यावेळी बोलताना संदीप जगताप म्हणाले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचा विसर आजच्या पिढीला पडत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आपण वाचले पाहिजे, तरच आपल्याला त्याग व समाजकार्य म्हणजे काय कळेल. आपण संरक्षणाबरोबरच शिक्षणावर खर्च करायला हवा, तरच देश भक्कम बनेल, असे सांगताना त्यांनी आजपर्यंत देशात व राज्यातील शेतकरी आत्महत्या करत होते; पण आता शेतकऱ्यांची कुटुंबच आत्महत्या करत आहेत. तरीही सरकार जागे होत नाही, ही शोकांतिका आहे. समाज जाती आणि धर्मामध्ये विभक्त होत चालला आहे, ते थांबले पाहिजे.
यावेळी सौरभ शेट्टी, कवी रमजान मुल्ला, अॅड. शमशुद्दीन संदे, मंडळाचे संस्थापक पं. स. सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, सचिव कालिदास पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. स्वप्निल पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. बाबासाहेब गुरव यांनी आभार मांडले.