लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अस्वच्छतेचा अंध:कार दूर करून स्वच्छता व आरोग्याचा प्रकाश देण्याचे ध्येय घेऊन गेल्या अडीच वर्षांपासून सांगलीत अखंडित स्वच्छता अभियान राबविणाऱ्या निर्धार फाऊंडेशनने बुधवारी अनोखा उपक्रम राबविला. रात्रभर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राबून रस्त्याच्या दुभाजकाची स्वच्छता व सुशोभिकरण केले.
सांगली-मिरज रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. दिवसभर या मार्गावर वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे अशा रहदारीच्या रस्त्यावर दिवसा स्वच्छता अभियान राबविणे कठीण झाले होते. त्यामुळे निर्धार फाऊंडेशनने नावाप्रमाणे या रस्त्यावरील दुभाजकाची स्वच्छता, डागडुजी व सुशोभिकरण करण्याचा निर्धार केला. कार्यकर्तेही तयार झाले. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून कामास सुरुवात केली. गुरुवारी पहाटेपर्यंत ते यासाठी राबत होते. राम मंदिर ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक या मार्गावर दुभाजकांवर यापूर्वी या संघटनेने वृक्षारोपणही केले होते. ही रोपे चांगली बहरली असून, दुभाजकासह परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहे.
एकीकडे झाडे बहरत असताना रहदारीमुळे धुळीने दुभाजक माखले होते. येथे कचरा, पालापाचोळा यांचीही गर्दी झाली होती. त्यामुळे त्याच्या स्वच्छतेचे काम फाऊंडेशनने हाती घेतले. रात्रीच्या अंधारात त्यांनी हे अभियान राबविले. दुभाजकाची अनेक ठिकाणी पडझड झाली होती. सिमेंट, वाळू आणून कार्यकर्त्यांनी याची डागडुुजीही केली.
रात्रभर केलेल्या या कामामुळे सकाळी अचानक या दुभाजकाचे व पर्यायाने रस्त्याचे रुपडे पालटले. जिल्हा परिषद तसेच अन्य आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांनाही रातोरात झालेला हा बदल सुखद धक्का देऊन गेला.
कार्यकर्त्यांचे कौतुक
फाऊंडेशनचे प्रमुख राकेश दड्डण्णावर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. अजिंक्य रोपळकर, मनोज पाटील, दीपक कोळी, संदीप तडसरे आदी युवकांनी रात्रभर श्रमदान केले. या त्यांच्या अभियानाचे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध घटकांतून कौतुक होत आहे.