कोकरूड : करमाळे (ता. शिराळा) येथील तीळगंगा नदीच्या पात्रात संततधार पाऊस सुरू असल्याने करमाळेसह सुरूल, ओझर्डे, नायकलवाडी, रेठरे धरण, गोळेवाडी व पेठ येथील शेतीला वरदान ठरणारा करमाळे तलाव यंदा जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात तुडुंब भरून वाहू लागला आहे.
दरवर्षी हा तलाव जुलैपर्यंत पूर्ण भरत असतो.
करमाळे परिसरात ५ जूनला वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे तलाव ७५ टक्के भरला होता. त्यात या दोन दिवसांच्या पावसाने भर पडली व गुरुवारी सकाळपासून तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे करमाळेपासून बहेपर्यंतच्या सुमारे ३५ किलोमीटरमधील ओढे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. या भागातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
कोट
तीळगंगा खोऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र लाखो लिटर पाणी वाहून जाते. हे पाणी अडवले तर या भागाचा दुष्काळ मिटेल. यासाठी प्रकाश पाटील (पेठ) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची व लोकसहभागाची गरज आहे.
- अमर पाटील, तीळगंगा प्रकल्प