इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडीच्या हद्दीत थांबलेल्या मालट्रकवर भरधाव वेगाने आलेल्या पिकअप जीपची पाठीमागून धडक बसून जीपमधील बाबूराव ज्ञानू झोरे (वय ३८, सध्या रा. तुर्भे, नवी मुंबई) जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास झाला.
याबाबत गणपत नाना भोरे या चालकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक कृष्णा विलास कांबळे (रा. उमरगा, जि. लातूर) याच्याविरुद्ध अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मालट्रक (एमएच १४ जीयु ९९२१) कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाघवाडीच्या हद्दीत थांबला होता. यावेळी पाठीमागून कृष्णा कांबळे पिकअप जीप (एमएच ०१ डीआर २५३८) घेऊन भरधाव वेगाने निघाला होता. कांबळे याने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये कांबळे याच्या शेजारी बसलेला बाबूराव झोरे जागीच ठार झाला. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करीत आहेत.