वांगी : कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने वांगी (ता. कडेगाव) येथे शनिवार, दि. १ मे पासून ७ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू केला असल्याची माहिती सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी दिली.
वांगी येथे माेठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याबाबत प्रशासन वेळोवेळी उपाययोजना करीत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे ७ दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असून, व्यापारी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आदेश डावलून कोणी दुकाने सुरू ठेवली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपसरपंच संजय कदम, बाबासाहेब सूर्यवंशी, राहुल सांळुखे, धनाजी सूर्यवंशी, यशवंत कांबळे, काशिनाथ तांदळे, रवींद्र कणसे, ग्रामसेवक विकास सुतार यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.