कोकरुड : गेल्या तीन वर्षांपासून परवानगीसाठी रखडलेली आणि सेवा देण्यावरुन दोन कंपन्यांच्या वादात अडकलेल्या शिराळा तालुक्यातील इंटरनेट सेवेला १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरुवात होत आहे. शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींना आता दररोज ३४ जीबी नेट वापरता येणार असून, ऑनलाईन कामे करण्यासाठी याचा मोठा लाभ ग्रामपंचायतींना होणार आहे.
केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी सर्व खेडी इंटरनेटने जोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर एक वर्षानी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीत नेटचे किटही बसविण्यात आले होते. मात्र, ही सेवा कोणी द्यायची आणि आकारणी कुणी करायची, यावरुन भारतीय दूरसंचार विभाग व बीबीएनएल यांच्यात वाद निर्माण झाल्याने तीन वर्षांपासून इंटरनेट सेवाच सुरु झाली नाही. उलट लाखो रुपयांचे साहित्य ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यात अडकून पडले होते.
अखेर बीएसएनएल आणि बीबीएनएल यांच्यात एकमत झाल्याने शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींपैकी ८०हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर-ई गव्हर्नर या दिल्लीच्या कंपनीने इंटरनेट सुविधा सुरु केली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीला दररोज ३४ जीबी नेट वापरता येणार आहे.
कोट
उच्च प्रतीची इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने सर्व ऑनलाईन कामे करण्यात अडथळे येत होते. इंटरनेट सेवा चांगली मिळाल्यास कामे वेळेत होऊन मार्गी लागतील. - सतीश पाटील, ग्रामसेवक, येळापूर
कोट
ग्रामपंचायतीत उत्तम दर्जाची इंटरनेट सुविधा मिळाल्यास ग्रामपंचायत, तलाठी, आरोग्य, शिक्षण विभागाची कामे वेळेत होऊन याचा लोकांना फायदा होईल. तसेच ग्रामपंचायतीमार्फत अनेक सोयी-सुविधा करण्यास फायदा ठरेल. - विजय पाटील, सरपंच काळूद्रे.