सांगली : माळबंगला येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी महावितरणकडून मंगळवारी वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी सांगली व कुपवाड शहरांतील काही भागांमध्ये सकाळी अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता पी. जी. हलकुडे यांनी केले आहे.
हलकुडे म्हणाले की, माळबंगला येथील महापालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्रातून सांगली व कुपवाड शहरांना पाणीपुरवठा होतो. मंगळवारी केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या नसल्याने बुधवारी सकाळी सांगली शहरासह कुपवाडमध्ये पूर्ण ताकदीने पाणीपुरवठा होणार नाही.
दरम्यान, गावभाग, विश्रामबाग, पुष्पराज चौक या परिसरांत दोन दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही भागांत तर पाणीपुरवठा झालेलाच नाही. त्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अडचणी येत आहेत.